मंडया : तीन वर्षीय बालिकेचा अपघाती मृत्यू प्रकरणी तिघां सहाय्यक फौजदारांना निलंबित करण्यात आले आहे.
ट्रॅफिक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मंड्या शहरात जुने बेंगळूर-म्हैसूर महामार्गावर स्वर्णसंद्रजवळ झालेल्या अपघातात रितिक्षा नावाच्या तीन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. शहरात या घटनेचे तीव्र उमटताच मंड्याचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन बालदंडी यांनी तात्काळ पावले उचलत हेल्मेट तपासणी करत असलेल्या तीन एएसआय अधिकाऱ्यांना निलंबित केले.
मृत बालिका रितिक्षा ही मद्धूर तालुक्यातील गोवरनहळ्ळी येथील रहिवासी अशोक आणि वाणी या दांपत्याची मुलगी होती.
गावातील कुत्र्याने चावल्यामुळे ते तिला उपचारासाठी मंड्याच्या मिम्स रुग्णालयात नेण्यात येत होते. यावेळी मंड्या शहरातील नंद सर्कल भागात ट्रॅफिक पोलिसांनी हेल्मेट तपासणीसाठी त्यांची दुचाकी अडविली. दुचाकी अडविण्यासाठी पोलीस अचानकपणे दुचाकीच्या समोर आल्याने अशोक यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी कोसळली आणि दुचाकीवरील अशोक आणि रितिक्षा खाली कोसळली. याचवेळी मागून येणाऱ्या टेम्पोने रितिक्षावर धडक दिली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतापलेल्या रितिक्षाच्या कुटुंबीयांनी बालिकेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केले. नागरिकांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून पोलिसांच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध केला आहे. काही वेळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. याची गांभीर्याने दखल घेत मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बालदंडी यांनी तात्काळ कारवाई करत एएसआय जयराम, नागराज आणि गुरुदेव यांना निलंबित केले.