बेळगाव : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देऊन त्यांची उत्तम जडणघडण करावी, असे विचार राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू त्यागराज यांनी मांडले.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात बेळगाव जिल्हा शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात कुलगुरू त्यागराज यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं इतकं दृढ असावं की विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःहून शिक्षकाकडे आले पाहिजेत. तरच विद्यार्थ्यांची प्रगती होईल, असेही
कुलगुरू त्यागराज म्हणाले.
प्रमुख वक्ते राघवेंद्र कागवाड यांनी यावेळी बोलताना, परिसर पर्यावरण, भारतीय संस्कृती, बदलती कुटुंब पद्धती, व नागरिक शिष्टाचार याबद्दल अमूल्य विचार व्यक्त केले.
याप्रसंगी विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, प्रशासक राजेंद्र कुलकर्णी, जिल्हा सचिव एस एल कुलकर्णी, विज्ञान प्रमुख एस. व्ही. व्हनुले, रामनाथ नाईक, महेश नरगुंदकर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती ओमकार, भारत माता फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सुजाता दप्तरदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तर प्रास्ताविक भाषण परमेश्वर हेगडे यांनी केले. त्यांनी संपूर्ण देशात सुरू असलेल्या विद्या भारतीच्या कार्याची माहिती दिली. यानंतर शिक्षकांना त्यांच्या विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्याभारती च्या वतीने आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती शिक्षकांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी यांनी केले तर एस व्ही कुलकर्णी यांनी
आभार मानले.
या शैक्षणिक संमेलनाला संत मीरा अनगोळ , संत मीरा गणेशपुर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, हनिवेल स्कूल खानापूर, गजाननराव भातकांडे स्कुल, देवेंद्र जिंनगौडा स्कूल, रामदुर्ग येथील शिक्षक वर्ग उपस्थित होते.