खानापूर : गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. आज शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य परिसरातील गवाळी भागात ही घटना घडली आहे.
गवाळीचे शेतकरी प्रकाश कृष्णा गुरव (वय 55) हे आपल्या पत्नीसह शिवाराकडे चालले होते. यावेळी रस्त्याशेजारच्या झुडुपात उभ्या असणाऱ्या गवी रेड्याने प्रकाश गुरव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रकाश यांच्या हाताला आणि कंबरेला गव्याचे शिंग लागून गंभीर जखम झाली. यावेळी जवळच उभ्या असलेल्या प्रकाश यांच्या पत्नीने जोरदार आरडाओरडा केला. या आवाजाने गव्याने जंगलात धूम ठोकली.
गवा पळून गेल्यानंतर प्रकाश यांच्या पत्नीने गाव गाठून गावातील लोकांना ही घटना सांगितली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पडलेल्या प्रकाश गुरव यांना गाठले. ही घटना गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर घडली होती. जखमी प्रकाश यांना घटना स्थळावरून इस्पितळापर्यंत नेण्याची कोणतीच वाहन व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांनी नजीकच्या झाडाझुडुपांतून काट्या तोडून तिरडीसारखे साधन बनवून त्यातून जखमी प्रकाश यांना गावात आणले. नंतर त्याला एका टेम्पोने खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव रुग्णालयात हलवण्यात आले.
[video width="480" height="864" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/10/VID-20251015-WA0008-1.mp4"][/video]