बेळगाव ( bn7 news) : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) आयोजित राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी बेळगाव जिल्ह्यातील 7 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
मणिपूरमधील इंफाल येथे उद्या 6 एप्रिलपासून ही राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप होणार असून या स्पर्धेसाठी कर्नाटक राज्यातून 20 विद्यार्थ्यांची निवड झाली असून या 20 खेळाडूंमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अदिती पाटील (मराठी विद्यानिकेतन शाळा, बेळगाव) वगळता या 7 खेळाडूंपैकी सहा खेळाडू हे ग्रामीण भागातील असून, आदर्श धायगोंडे, नागेश अनगोळकर, श्रद्धा कासर, सृष्टी मुतगेकर (वरील चारजण शिवाजी हायस्कूल, कडोली) व पूर्विता दोमने (स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, कडोली) हे पाचजण कडोलीचे, वरुण बेनके (सरकारी हायस्कूल, कल्लेहोळ) हा कल्लेहोळ गावातील विद्यार्थी आहे.
हे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर 52 किलो, 58 किलो, 62 किलो, 70 किलो, 74 किलो, 80 किलो आणि 80 किलोहून अधिक वजनी गटात आपले कौशल्य दाखविणार आहेत.

या खेळाडूंना प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी व कर्नाटक संघाचे सरव्यवस्थापक रमेश अलगुडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हे विद्यार्थी दररोज 3 ते 4 तास जिल्हा क्रीडांगणात कठोर सराव करत आहेत.
या खेळाडूंचा प्रवासाचा खर्च पालकांनी स्वतः उचललेला असून त्यांना शासकीय मदत मिळणे आवश्यक असल्याचे क्रीडाप्रेमीतून सांगितले जात आहे. ही कहाणी ग्रामीण भागातील जिद्दी, संघर्षशील आणि क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची असून, त्यांच्या वाटचालीसाठी प्रशासनाबरोबर संघ-संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.
निवड झालेला खेळाडू नागेश अनगोळकर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाला की, “माझे वडील नाहीत, आई मनरेगा योजनेअंतर्गत मजुरी करते. गरिबी असूनही आईने मला खेळासाठी प्रोत्साहन दिलं. राष्ट्रीय पातळीवर विजय मिळवायचं स्माझं वप्न आहे.
श्रद्धा कासर म्हणाली “मी 55 किलो वजनी गटात स्पर्धा करणार आहे. अभ्यास व सराव यामध्ये समतोल राखला राखला आहे. वडील बांगडी विक्रीचा व्यवसाय करतात. भारतीय लष्करात सेवा बजावणे हे माझं अंतिम ध्येय आहे.”
श्रद्धाचे वडील सुनील कासर यांनीही मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,“कडोली गावात पहिल्यांदाच वेटलिफ्टिंगसाठी मुलांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. आम्ही स्वतःच्या पैशातून विमान प्रवासाचं नियोजन केलं आहे. ही मुलं विजय मिळवून बेळगाव व कर्नाटकचं नाव उज्ज्वल करतील.”
शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना “हे सर्व विद्यार्थी गरीब घरातील असून, शिक्षक व शाळा प्रशासन त्यांच्या आर्थिक मदतीसाठी पुढे आली आहे. सरकार व जिल्हा प्रशासनानेही सहकार्य करावं.” असं म्हटलं आहे.
